Sunday, June 17, 2012

srinagar sight seeing


श्रीनगर दर्शन.....

मुघल गार्डन्स्, परीमहल ला भेट-

सकाळी 9 वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो. आज श्रीनगरमध्ये फिरायचे होते. सुरूवातीला मुघल गार्डनचे नाव खूप ऐकले होते. चश्मेशाही गार्डन, निशात गार्डन आणि शालिमार गार्डन या तिन्हींना मिळून मुघल गार्डन्स् हे नाव आहे. सुरूवातीला आम्ही चश्मेशाही बागेत गेलो. तेथे सुंदर असे प्रवेशद्वार उंच ठिकाणी होते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांना छान वेगवेगळे आकार दिले होते. प्रवेशद्वाराच्या पाठीमागे उंच हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या.



आत गेल्यानंतर विविध प्रकारची फुलझाडे दिसली. विशेषत: ट्युलिप, गुलाब, झेनिया अशी मोहक फुलझाडे होती. आत गेल्यानंतर समोरच एक छान कारंजे होते. मध्ये हिरवळीवर बसून आम्ही काही फोटो काढले.
खरोखरच काश्मिर म्हणजे जणू स्वर्ग आहे असे इथे जाणवले.

आम्ही तिथून पुढे परीमहल नावाच्या बागेत गेलो. हे सहा मजली गार्डन शाहजहान चा मुलगा दारा शिकोह याने 17व्या शतकात बांधलेले आहे. प्रत्येक मजल्यावर त्याकाळच्या बांधकामांचे अवशेष आहेत. त्यामध्ये दगडाच्या केलेल्या कमानी, पाण्यासाठीचे हौद, काही खोल्यांचे अवशेष अशा विविध रचना पाहायला मिळतात.
परीमहलचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथून पूर्ण दाल सरोवर आणि श्रीनगरचा बराच भाग दिसतो. इथून दिसणारे निसर्गदृश्य खरोखरच अभूतपूर्व असेच होते.
श्रीनगर हे खूप संवेदनशील असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. येथेही काही सीआरपीएफ चे जवान होते. मुलांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.




इथेही बरीच मोहवणारी फुलझाडे होती.

यानंतर आम्ही निशात बागेत गेलो. प्रत्येक बागेत गेले तर नवीनच वाटत होते. निशात बाग ही दाल सरोवरच्या समोरच आहे. या बागेतूनही दाल सरोवराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. निशात बागेत लांबच लांब अंतर्गत रस्ते केलेले आहेत. त्याच्या बाजूला रांगेत मोहक फुलझाडे लावलेली आहेत. त्यातली जांभळ्या रंगांच्या फुलझाडांची रांग खूपच छान वाटत होती.


शालीमार बागेत प्रवेश केल्यानंतर कारंजांची एक रांगच दिसली. कारंजातून उडणारे तुषार मन मोहवून टाकत होते. कारंजांच्या अलीकडे एक महल होता. तिथे पाणी जमा होऊन धबधब्यासारखे खाली पडत होते. ते दृश्य खूप छान दिसत होते. शालीमार बागेत असणारी विविधरंगी फुले मनाला आनंद देत होती.



शंकराचार्य मंदिर

श्रीनगरमध्ये अजून एक ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे शंकराचार्य मंदिर. श्रीनगर मध्ये सर्वात उंचावर असणारे हे मंदिर भगवान शंकराचे आहे. श्रीनगरपासून 2000 फूट उंचावर असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला संरक्षित जंगल आहे. या मंदिराकडे जाताना सी आर पी एफ चे चेक पोस्ट आहेत. हा चेक पोस्ट पार केल्यानंतर आजूबाजूला घनदाट झाडी लागते. मुख्य मंदिराजवळ प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. मोबाईल, कॅमेरा या वस्तू आत नेउ देत नाहीत. त्यामुळे आम्हाला या वस्तू गाडीतच ठेवाव्या लागल्या. मंदिराजवळ गेल्यानंतर तेथे सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. मंदिराला जाण्यासाठी ब-याच पाय-या आहेत. उंच उंच पाय-या चढून सर्वांनाच दम लागला. वर मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी कमरेचा बेल्ट काढून ठेवावा लागतो. गाभा-यात जाण्यासाठीच्या पाय-यासुद्धा खूप उंच उंच आहेत. हे मंदिर इ. स. पूर्व 200 साली बांधले गेले आहे. तेथे आम्ही महादेव पिंडीचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घालताना पूर्ण श्रीनगरचे विहंगम दृश्य इथून पहायला मिळते. दाल सरोवर, नदी, इमारती, विविध रंगी हॉटेलच्या इमारती, रिसॉर्टस्, काही ठिकाणी दाट झाडी, पलीकडे दूर डोगरांवर दिसणा-या काही इमारती सगळे दृश्य नेत्रविस्फारक होते. नंतर आम्ही शंकराचार्य समाधी स्थळाचे दर्शन घेतले. उंचावर असल्यामुळे येथील वातावरण खूप थंड होते.



दाल सरोवर-

मुलांना दाल सरोवरात जाऊन शिकाराची सफारी करण्याचे खूप आकर्षण होते. दुपारी 4 वाजता आम्ही दाल सरोवरासमोर गेलो. अथांग सागराप्रमाणे दिसणारे दाल सरोवर छान दिसत होते. दूरवर हाऊसबोट दिसत होत्या. हाऊसबोट म्हणजे सरोवरात एका ठिकाणी स्थिर असणा-या बोटी. प्रत्येक हाऊसबोटमध्ये 4 ते 6 रूम असतात. तेथे अगदी हॉटेलप्रमाणे पॉश राहण्याची व्यवस्था असते. या दाल सरोवरात काही लहान बोटी दिसत होत्या. त्यांना शिकारा असे म्हणतात. त्या छान सजवलेले असते.




दाल सरोवराचा फेरफटका मारण्यासाठी किंवा हाऊसबोट पर्यंत जाण्यासाठी या शिकाराचा वापर होतो. आम्ही दोन शिकारा किरायाने केल्या. शिकारा चालवणारे स्वभावाने चांगले होते. शिकारामध्ये बसल्यावर त्यांनी आम्हाला दाल सरोवराची माहिती देण्यास सुरूवात केली. दाल सरोवरची खोली 10 फुट आहे. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे हे सरोवर पूर्ण गोठून जाते. यावर मुले फुटबॉल खेळतात. त्यावरून चालता येते हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही शिकारातून फिरत असताना दुस-या शिकारातून काही दुकानदार फिरत होते. बाजूच्या एका शिकारातून एक फोटोग्राफर आला. तो शिकारा चालवून फोटोग्राफी करत असे. नंतर एक मक्याचे कणीस भाजून देणारा आला. अशा प्रकारे अनेक दुकानदार शिकारातून फिरत होते. थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला. शिकारावाल्याने आम्हाला हाऊसबोटच्या जवळ नेले. पावसापासून बचावासाठी सर्व व्यवस्था केली व आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दाल सरोवराच्या बाजूला एक गाव होते. तेथील लोक सरोवरामध्ये व बाजूला शेती करतात. सरोवरामध्ये असलेल्या शेतीला फ्लोएटिंग गार्डन म्हणतात. सरोवरावर एक थर तयार करून त्यावर माती टाकून शेती केलेली असते. विशेषत: चटया विणण्यासाठी वापरणारे गवत येथे उगवले जाते. सरोवराच्या बाजूच्या शेतीमध्ये पालेभाज्या, फळभाज्या उगवल्या जातात. आम्ही गेल्यावर कांदा, कद्दू, गोबीची झाडे पाहिली. सरोवरात अनेक कमळ फुलले होते. वरून पाऊस मात्र चालूच होता. दाल सरोवरात एक तरंगते मार्केटही आहे. तेथे आम्ही काही खरेदी केली. 1.30- 2 तासाचा फेरफटका मारल्यानंतर आम्ही परत आलो.
सायंकाळी 7 वाजता जेवण करून आम्ही हॉटेलवर परत आलो.

जम्मूकडे परतताना.........
26 मे ला सकाळी 3.30 लाच उठलो. हॉटेलवाल्यांनी चहाचे सामान (इलेक्ट्रीक केट्टल, दूध पुडा, डीप चहा पावडर) आदल्या दिवशी रात्रीच देऊन ठेवले होते. 5 वाजेपर्यंत तयार होऊन आम्ही जम्मूकडे परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळची  ट्रेन होती. तरी जम्मू मार्गावर कधीही आणि कितीही वेळासाठी ट्रॅफिक जाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. आम्ही निघाल्यावर खूप थंडी होती आणि पाऊसही सुरू होता. रस्त्याने येताना पामपोरा हे गाव होते. तेथे खूप केसरचे मळे पाहायला मिळाले. येतानाच्या प्रवासात पुन्हा निसर्गरम्य परिसर पाहावयास मिळाला. जवाहर बोगद्यातून येताना मजा वाटली. आजूबाजूला डोंगर, दरी, नद्या, झरे पाहून खूप आनंद वाटला. काश्मिर हे खरोखरच पृथ्वीवरील नंदनवन आहे याचा प्रत्यय आला. काश्मिरमध्ये येणारी गवताची फुले देखील एवढी सुरेख असतात की मन मोहून जाते. आम्ही जसजसे जम्मूकडे येत गेलो तसतसे वातावरण गरम होत गेले. आम्ही लवकर निघाल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जाम जास्त झाला नाही. जवाहर बोगद्याच्या रक्षणासाठी तेथे सीआरपीएफ चे खुप जवान तैनात होते. ते ठराविक अंतरावर उभे होते. आपल्या गावापासून दूर येऊन ते येथे देशाच्या रक्षणासाठी झटत होते. आम्ही त्यांना काही भेटी दिल्या. काहीजण युपीचे होते तर काही महाराष्ट्रातील. आम्ही भेटल्यामुळे त्यांना खूप छान वाटले. आम्हालाही खूप समाधान वाटले.



नंतर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबून थोडे खाऊन घेतले व पुढे जम्मूकडे निघालो.
आम्ही दुपारी 3 वाजता जम्मूला पोहोचलो. पाहतो तर तिथले तापमान 40 अंश. श्रीनगरला तापमान असेल 9 अंश आणि जम्मूला 40 अंश. या तापमानातल्या फरकामुळे मला ताप आला. ड्रायव्हरला अलविदा करून आम्ही स्टेशनवर थांबून आराम केला. जम्मूच्या स्थानकावर खूपच गर्दी होती.
रात्री 8.40 च्या उत्तरक्रांती एक्सप्रेसने आम्ही दिल्लीकडे परत निघालो. 



आमचा काश्मिर प्रवास खरोखर अविस्मरणीय ठरला. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या नंदनवनास भेट द्यायलाच हवी.
  

  

Visit to Gulmarg….


ग़ुलमर्गकडे-

सकाळी लवकर उठून आम्ही फ्रेश झालो. सकाळी 8 वाजता नास्ता रूममध्ये आला. हॉटेलवाल्यांनी सुंदर नास्ता दिला. आम्ही 9 वाजता बाहेर पडलो. गुलमर्ग श्रीनगरपासून 50 किमी आहे. जाताना आम्हाला श्रीनगरमधील मार्केट्चे दर्शन झाले. जाताना दोन्ही बाजूला सफरचंद, अक्रोडचे मळे पाहायला मिळाले. सफरचंदाचे झाड आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. याला हिवाळ्यात फळे येतात.
रस्त्याने खूप निसर्गसौंदर्य पाहायला मिळाले. जसजसे पुढे जाऊ तसे बर्फाचे डोंगर जवळ दिसत होते.  आम्ही बर्फाच्या डोंगरावर जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. जाताना रस्त्याच्या कडेला अनेक चेरी आणि स्ट्रॉबेरीची दुकाने होती. एका ठिकाणी थांबून आम्ही फोटो काढले.


पुढे गेल्यानंतर आम्हाला टॅंगमर्ग हे गाव लागले. येथे थांबल्याबरोबर आम्हाला एक गाईड भेटले. त्यांचे नाव होते अब्दुल चाचा. वय वर्ष 65. त्यांनी आम्हाला बर्फावर जाण्यासाठी कोट आणि रबरी बुट किरायाने घ्यायला लावले. ते घालून व अब्दुल चाचांना घेऊन आम्ही पुढे निघालो. गाडीमध्ये चाचांनी आम्हाला माहिती सांगायला सुरूवात केली. आजुबाजुचा परिसर, देवदारची झाडे, तेथील वातावरण याविषयी त्यांनी सविस्तर माहीती दिली. येथे कधीही वातावरण बदलू शकते आणि बर्फ पडू शकतो. आम्ही गुलमर्गच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला एक धक्कादायक अनुभव आला. अब्दुल चाचा होते म्हणून आम्ही वाचलो. त्याचे झाले असे- गुलमर्ग जवळ आल्यानंतर एक डावीकडे आणि एक उजवीकडे असे दोन रस्ते फुटतात. उजवीकडे जाणारा रस्ता मुख्य ठिकाणाकडे जातो. आणि डावीकडे जाणारा रस्ता आडवळणाने डोंगराकडे जातो. तेथे आम्हाला काही जणांनी अडविले. ते म्हणत होते की आमचेच घोडे वर जाण्यासाठी करा. ते लोक दिसायला भेसूर दिसत होते. एक जण तर गाडीच्या एकदम समोर येऊन उभा राहिला व मोठाले डोळे करून आमच्याकडे बघत होता. अब्दुल चाचांनी त्याला काश्मिरी भाषेत दटावले. तरीही ते हटायला तयार नाहीत. थोडा वेळ असेच चालले. शेवटी चाचा खूप ओरडल्यानंतर ते बाजूला हटले. आम्ही पुढे गेल्यावर अब्दुलचाचा म्हणाले,’ आतंकवादी साले। आम्हाला खूप हायसे वाटले.
आम्ही गुलमर्गमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच काही घोडेवाले आमच्या मागेच लागले. एक जण तर आमच्या गाडीवर चढून पार्कींगपर्यंत आला. गाडीतून उतरल्यानंतर त्याच्याशी घासघिस करून 6 घोडे ठरवले. हे काम आम्ही अब्दूल चाचा कडे सोपवले. कारण आम्ही नवीनच असल्यामुळे आम्हाला तिथले रेटस् माहीत नव्हते.
जिथून आम्ही घोड्यांवर बसलो तो परीसर खूपच आकर्षक होता. सभोवताली दूरपर्यंत हिरवळ पसरलेली होती. दूरवर बर्फाचा डोंगर दिसत होता जिथे आम्हाला पोहोचायचे होते. वर निरभ्र आकाश होते. आधी पोपटी रंग पुढे पांढरा रंग आणि वरती निळा रंग हे रंगांचे मिश्रण अनोखे दिसत होते.
अब्दुल चाचांनी आम्हा सर्वांचे घोड्यावर बसलेले फोटो काढले आणि तेथून आमची घोडेस्वारी सुरू झाली.


सुरूवातीला थोडा वेळ सवय नसल्यामुळे त्रास झाला नंतर मजा वाटत होती. लहान मुले मात्र न घाबरता घोड्यावर बसली. आम्हाला सुचना दिल्या गेल्या. लगाम आपल्या हातात पकडून धरा. पुढे खराब रस्ता आहे. डावीकडे जायचे असेल तर लगाम डावीकडे ओढा. उजवीकडे जायचे असेल तर लगाम उजवीकडे ओढा. घोडा थांबवायचा असेल तर लगाम खेचून ठेवा. चढ असेल त्यावेळी आपला भार पुढे द्या. उतार असेल त्यावेळी मागे भार द्या. आणि खरोखरच या सुचनांचा आम्हाला खूप फायदा झाला.     
     आम्ही गेलो त्या दिवशी 2 महिन्यानंतर पहिल्यांदा सुर्य उगवला होता. आणि स्वच्छ, निरभ्र वातावरण होते. अब्दुल चाचा म्हणाले,’ तुम बहुत लकी हो, आज मौसम इतना अच्छा है। तुम कुछ अच्छा काम करते हो इसलिये आजा आपको सब देखने को मिलेगा। आणि झाले तसेच. पूर्ण दिवस स्वच्छ वातावरण होते. त्यामुळे आम्हाला पूर्ण आनंद अनुभवता आला.
पुढे गेल्यावर खिलनमर्ग अशी पाटी दिसली आणि तिथून कच्चा रस्ता सुरू झाला. या कच्च्या रस्त्याने आम्हाला चढून बर्फाच्या डोंगरापर्यंत जायचे होते. घोडे शिकलेले होते त्यामुळे त्यांना त्या रस्त्यावरील चढ उतार पूर्ण माहीत होते. जातानाचा रस्ता खूपच खराब होता. रस्त्यात मोठमोठे दगड, उंच उंच झाडे, जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेली झुडपे, मध्येच रस्त्यात असणारे झरे होते.



कालच पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता आणी रस्ता निसरडा झाला होता. आमच्या 6 जणांकडे 6 घोडे होते. पण प्रत्येक घोड्याची त-हा वेगळीच होती. माझा घोडा झाडाच्या अगदी जवळून जात असे. सुरूवातीला मला समजलेच नाही. त्यामुळे मला सुरूवातीला दोनदा गुडघ्याला लागले. नंतर मात्र मी सावध झालो. मी लगाम ओढून घोड्याला झाडापासून दूर करत होतो. पण अनेकदा झाडाखालून जाताना झाडाच्या वरच्या फांद्या डोक्याला लागण्याची भिती वाटत होती. कधी पायाला झुडपे लागत होती त्यामुळे अडकवलेले पाय बाहेर निघायचे. माझ्या घोड्याचे नाव होते करण आणि वर्षाच्या (पत्नी) घोड्याचे नाव होते अर्जुन. ते एका मागोमाग एक चालायचे. झ-यावर एक घोडा पाणी प्यायला थांबला की दुसरा घोडा देखील थांबत असे. घोडा पुढे झुकला की आम्हाला मागे भार द्यावा लागायचा. मुलांचे घोडे मात्र खूप आज्ञाधारक दिसत होते. जाताना आणि येतानाही त्यांनी काहीच त्रास दिला नाही. मात्र अतुलचा घोडा एकदम टेकडीवर जाऊन उभा राहिला. आम्ही सगळे घाबरलो. कारण घोड्याला पुढे जायला रस्ताच नव्हता. पण घोडेवाल्याने पळत जाऊन त्याला धरून आणले व मार्गाला लावले.
आम्ही 2 तासानंतर वर बर्फाच्या डोंगराजवळ पोहोचलो. त्यादिवशी स्वच्छ सुर्यप्रकाश होता. त्यामुळे बर्फाचे डोंगर चांदीप्रमाणे तळपत होते. अब्दुल चाचा पुन्हा एकदा म्हणाले, तुम बहूत भाग्यवान हो की आपको इतना खूबसुरत नजारा देख रहे हो।
आम्ही घोड्यावरून उतरलो आणि बर्फावर गेलो. आम्ही प्रथमच बर्फावरून चालत होतो. रबरी बूट असल्यामुळे पाय बर्फात फसत होते व मजा येत होती. थोडे पुढे गेल्यावर अजून बर्फ वाढला. आमच्यासोबत अब्दुल चाचांनीही बर्फ खेळला.



मुलांसाठी स्लेज गाडी केली. या स्लेज गाडीने मुलांना वर चढवत नेले आणि येताना त्या स्लेज गाड्यांवरून आम्ही खाली घसरत आलो. खूप मजा आली. 1 तास तेथे थांबून परत घोड्यांवर निघालो. तिथून यावेसे वाटत नव्हते. महाराष्ट्रात एवढा उन्हाळा असताना भारतातल्याच एका ठिकाणी एवढे थंड वातावरण असेल आणि बर्फ असेल हे स्वप्नवतच वाटले. भारताचे हेच वैशिष्ट आहे- विभिन्नतेतून एकता. 

परत येताना पूर्ण उतार असल्यामुळे घोड्यांवर मागे भार देऊन बसावे लागले. परत येताना थोडे अवघड वाटले. मोठमोठ्या दगडांमधून, चिखलातून, झ-यांमधून येताना भिती वाटत होती. परंतू घोडे चांगले असल्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. आमच्यासोबतचे सर्व घोडेवाले आणि अब्दुलचाचा मोकळे वाटले. जाऊन परत येईपर्यंत त्यांच्या गप्पा चालू होत्या. मराठी पर्यटक तिकडे बरेच जात असल्यामुळे त्यांना चांगला’, इकडे’, तिकडे’, कसे वाटतेय असे काही शब्द पाठ होते. त्यांच्या वेगळ्या उच्चारांमुळे मजा वाटत होती. त्यांनी आम्हाला काही काश्मिरी शब्द, वाक्य शिकविले. वेळ कसा गेला ते समजले नाही.
खाली आल्यावर पुन्हा निसर्गरम्य परिसर, हिरवळ, गोल्फ कोर्स दिसले. अब्दुल चाचांचे माहिती सांगणे चालूच होते. मन या हिंदी सिनेमाचे चित्रिकरण झालेले हॉटेल दाखवले. सर्वच घोडेवाले आणि अब्दुलचाचा आमच्यात मिसळून गेले होते. आम्ही घोड्यांवरून उतरून गाडीत बसलो. अब्दुलचाचाही आमच्यासह टॅंगमर्ग पर्यंत आले. तेथे आम्ही कोटस्, बूट परत केले. 4-5 तासाच्या भेटीतच अब्दुलचाचांची आणि आमचे संबंध घनिष्ठ झाले होते. त्यांना सोडायला आम्हाला नको वाटले. आम्हाला टाटा करताना त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू आले. गुलमर्गमध्ये सर्वांना अब्दुलचाचा सारखा गाईड मिळावा असे वाटते.
आजचा दिवस खूप आनंददायी आणि रोमांचक अनुभव देणारा ठरला.
आमचे ठरल्याप्रमाणे आम्ही दुस-या दिवशी जर गुलमर्गला गेलो असतो तर आम्हाला हा आनंद मिळाला नसता कारण दुस-या दिवशी तेथे पुन्हा पाऊस पडला होता. म्हणजे आमचे दैवच चांगले होते.

Journey from Katra to Srinagar


Journey from Katra to Srinagar
श्रीनगरकडे....

23 मे ला सकाळी 7 वाजता Qualis गाडीने कटराहून श्रीनगरकडे निघालो. गाडी आणि ड्रायव्हरही आम्हाला चांगला मिळाला. कटरा ते श्रीनगर हे अंतर जवळपास 263 किमी आहे. हा रस्ता पूर्ण घाटाचा आहे. त्यामुळे एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला दरी असा रस्ता आहे. जाणारी आणि येणारी वाहने एकाच रस्त्याने जातात. त्यामुळे ड्रायव्हरने जास्त जागरूक राहणे आवश्यक असते. आमचा ड्रायव्हर 26 वर्षाचा तरूण पंजाबी ड्रायव्हर होता. त्याचे नाव होते बंटी. तो उधमपूर जवळील एका खेड्यात राहणारा होता. घरची परिस्थिती साधारण असल्याचे तो सांगत होता. त्याच्या वागण्यावरून तो सालस व शांत वाटत होता.
कटराहून 50-60 किमी अंतर पुढे आल्यावर एक शनिमंदिर दिसले. मोठी 10 फूट उंच शनिदेवाची मूर्ती होती. तेथे थांबून आम्ही दर्शन घेतले. या प्रवासातील एक ना एक क्षण अनुभवण्यासारखा होता. प्रत्येक वेळी निसर्ग सौंदर्याचे विविध पैलू अनुभवायला मिळत होते. हिमालयाच्या पर्वतरांगा प्रत्येकवेळी आमची सोबत करत होत्या. रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे थोडे पुढे गेले की मागचा वळणरस्ता दिसायचा. दुरून दिसणारा रस्ता, त्यावरून जाणारी वाहने खेळण्यातील वाहनाप्रमाणे दिसत होती.
ईश्वराने निसर्गात रंगांची उधळण कशी केली आहे बघा. अगदी वरती निळे आभाळ, त्यात असलेले कापसाप्रमाणे शूभ्र ढग, त्याखाली दिसणारे कधी राखाडी, कधी बदामी तर कधी सोनेरी रंगांचे पर्वत, त्यावर जागोजागी झाडांचे हिरवे लेणे, कधी कधी डोंगरावर दिसणारी विविधरंगी घरे, पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी नदी, वाहणा-या नदीचा रंग दुधाळ तर काही ठिकाणी संथ वाहणारा निळसर प्रवाह, नदीकाठी आणि पर्वतावर येणारी विविधरंगी फुले.
 हे सर्व काही अजब होते.
रस्त्यात उधमपूर लागले. येथे आर्मीचे कमांड मुख्यालय तसेच एअर फोर्स चे कार्यालयही आहे. या कार्यालयांच्या गेटवर प्रतीक म्हणून रणगाडे ठेवले आहेत. रणगाडे आणि बंदूकधारी जवान पाहून मुलांना खूप आनंद झाला. गाडीची स्पीड कमी करून मुलांनी जवानांना सलामी दिली. त्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. उर देशाभिमानाने भरून आले.   
सकाळी 11 वाजता आम्ही पटनीटॉप येथे पोहोचलो. येथे थंड वातावरण होते. तेथे नाग बाबाच्या मंदिरासमोर थांबलो. तेथे थांबल्याबरोबर काही दुकानदार मागे लागले. ते म्हणत होते, ’बुलबुल का बच्चा लेलो साब, बुलबुल का बच्चा|’
आम्हाला त्यांच्या बोलण्याचा काही उलगडा झाला नाही. पुढे मंदिरासमोर पादत्राणे काढताना एक लहान 8-9 वर्षाचा मुलगा समोर आला. त्याचे बोलणे त्याच्याच शब्दात- साब बुलबुल का बच्चा लेलो बुलबुल का बच्चा। आप सिर्फ देखो साब। देखने के कुछ पैसे नही लगेगे। आप देखोगे तो मुझे 10 पॉंईंट मिलेंगे। मेरे 100 पॉईंट हुए तो मुझे 300 रुपए मिलेंगे। आप देखोगे न साब। त्याचे बोलणे खूपच गोड होते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे दर्शन घेऊन आलो. मंदिराच्या परिसरात खूपच गार वारे सुटले होते. तेथील आजूबाजूचा परिसर खूप निसर्गरम्य होता. तेथे आम्ही फोटोही काढले.



दर्शन घेऊन परतल्यावर बुलबुलचे रहस्य कळाले. बुलबुल म्हणजे काश्मिरी गालिचा. पर्यटकांनी दुकानात येऊन गालिचे बघावेत हीच त्यांची अपेक्षा.
पटनीटॉप येथे पाडोरा एंक्लेव नावाचे JKTDC चे रिसॉर्ट आहे. तेथे आम्ही गेलो. तेथे पूर्ण हिरवळ, हिरव्या रंगाची घरे, बाजूला थोडा चढाचा डोंगर, त्यावर गगनाला भिडणारी उंच उंच झाडे सर्व काही अद्भुत होते. तेथून परत येऊ नये असे वाटत होते.






अर्ध्या तासात आम्ही पटनीटॉपवरून पुढे निघालो. पुन्हा घाटाघाटाचा रस्ता सुरू झाला. हा श्रीनगरकडे जाणारा मार्ग व आजुबाजूचा परिसर एवढा मोहक आहे की क्षणाक्षणाला निसर्ग आपले रूप बदलत राहतो. एका बाजुने पाहिले तर खोल दरी, खाली कधी शांत तर कधी आवाज करत वाहणारी अवखळ नदी, नदीपलीकडे झाडी, काही घरे, थोडे वर पाहिले तर समोर पर्वतातून वाट काढत जाणारा रस्ता, त्या रस्त्यावरून दिसणारी बारीक वाहने असे दृश्य तर दुस-या बाजूला उंच उंच डोंगर, त्यावर मोठे मोठे वृक्ष तर पायथ्याशी फुलणारी रानफुले. किती सुंदर देखावा!
या मार्गावर डाळींबाची खुप झाडे आहेत. आम्ही गेलो त्यावेळी डाळींबाला खूप फुले आलेली होती. त्यामुळे ती झाडे खूपच छान दिसत होती.        
दुपारी 1.30 वाजता जेवणासाठी एका हॉटेलवर थांबलो.
तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो. या श्रीनगर मार्गावर कधीही ट्रॅफिक जाम होऊ शकतो. येथील वातावरण कधीही बिघडू शकते. कधीही डोंगरावरून दरड कोसळून रस्ता बंद होऊ शकतो. काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू असेल तर किंवा जवानांसाठीचा ताफा जात असेल तरीही ट्रॅफिक जाम होऊ शकतो.
रामबल या गावाजवळ रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन वाहनांची भली मोठी रांग तेथे लागली. आमच्या ड्रायव्हरने गाडी रांगेत लावली. हा जाम किती वेळ राहील हे कुणालाच सांगता येत नव्हते. अजून कहर म्हणजे पाठीमागून येणारी काही वाहने रांगेत न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी समोरून येणा-या वाहनांचीही रांग होती. त्यामुळे अजुनच वाहतुकीची कोंडी झाली. आमचा ड्रायव्हर अगदी सरळमार्गी होता. त्याने मात्र शेवटपर्यंत गाडी रांगेतच ठेवली. 3 तासानंतर वाहतुकीची कोंडी फुटली. हळूहळू सर्व वाहने पुढे सरकत होती. पुढे गेल्यावर कळाले की ही रांग जवळपास 2 किमी होती.
ट्रॅफिक जाममुळे आम्हाला खूप उशिर झाला होता. रात्री 7 वाजले होते. आम्ही जवाहर बोगद्याजवळ आलो. हा बोगदा 2.5 किमी लांबीचा आहे. जम्मू ते श्रीनगर हा रस्ता 12 महीने खूला रहावा यासाठी 1956 मध्ये हा बोगदा बांधल्या गेला. हा बोगदा बनिहाल आणि काझीगुंड या दोन गावांना जोडतो. यात जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन रस्ते आहेत. अचानक उजेड आणि 4-5 मिनिट अचानक अंधार यामुळे मुलांना खूप मजा वाटली. या बोगद्याच्या संरक्षणासाठी येथे बरीच फौज असते.
श्रीनगरला पोहोचायला आम्हाला 9 वाजले होते. तेथून आमचे हॉटेल शोधायला अर्धा तास लागला. श्रीनगरमध्ये प्रवेश  केल्यावर असे वाटले नाही की आपण एखाद्या राजधानीच्या शहरात गेलो आहे. तेथे सगळीकडे अंधारच होता. कुठे झकपक लाईटस् नाहीत किंवा जाहिरातीचे होर्डिंग्स् नाहीत. हॉटेलही खूप प्रकाशमान फलक लावत नाहीत. याचे कारण काही कळू शकले नाही. कदाचित अतिरेक्यांची भिती असेल. असो.
आम्ही हॉटेलसमोर पोहोचलो. तेथे हॉटेलचा मॅनेजर आला होता. तेथे मोठे गेट होते. तेथील सुरक्षा रक्षकांनी गेट उघडले. नंतर आमची गाडी आत गेली. हॉटेलचा परिसर मोठा दिसत होता. हॉटेलचे नाव होते ‘Orchade Villa Nedous’. नावाप्रमाणेच ते एक Villa होते. दूर दूर अंतरावर झोपडीप्रमाणे रूम होत्या. प्रत्येक ब्लॉक मध्ये 3 रूम्स् व एक बाथरूम होते. ते एक 4 तारांकित हॉटेल होते. व्यवस्था खूप छान होती. आम्ही फ्रेश होऊन आराम केला. कारण उद्या गुलमर्गला जायचे होते.


Wednesday, June 6, 2012

Visit to Vaishnodevi


वैष्णोदेवी कडे......

त्या दिवशी रात्री आम्ही जुन्या दिल्ली स्थानकावर गेलो व तेथून जम्मु मेलने प्रवास सुरू केला. सकाळी 10 वाजता जम्मु स्थानकावर पोहोचलो. तेथे फ्रेश होऊन पुढे कटराला जाण्यासाठी बसने निघालो. खाजगी बसने कटराला जाताना महाराष्ट्राप्रमाणेच अनुभव आला. म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खाजगी वाहने भरताना प्रवासी कोंबतात त्याप्रमाणे सुरूवातीला आलेल्यांना सीटवर, नंतर ड्रायव्हरच्या केबीनमध्ये व शेवटी गरज पडली तर जाण्यायेण्याच्या रस्त्यामध्ये कॅरेट टाकून त्यावर सीटचे कव्हर टाकून त्यावर दोघा- तिघांना बसवितात. असो. लोकांनाही adjustment ची सवयच झालेली आहे.
बसमध्ये बसल्यानंतर रस्त्यात खूप छान निसर्ग विशेषत: डोंगर, झाडी पहावयास मिळाली. रस्त्यात बस थांबल्यावर आम्ही फोटोही काढले.


कटराकडे जाताना आम्हाला घरांची संख्या खूप कमी दिसली. परंतू आर्मी, सी आर पी एफ़ च्या छावण्या जास्त दिसल्या. आणि जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्थेची कल्पना आली.
सायंकाळी 4 वाजता आम्ही कटराला पोहोचलो आणि JKTDC च्या हॉटेलमध्ये थांबलो. कटराला गेल्यावर शहरात वैष्णोदेवीला जाणा-या यात्रेकरूंची अलोट गर्दी दिसली. मी तयार होऊन यात्रा पर्ची मिळवण्यासाठी रांगेत लागलो. जवळपास दीड तासानंतर कुटुंबासाठीची पर्ची मिळाली. येथे तेथील ट्रस्टचे ढिसाळ नियोजन अनुभवायला मिळाले. कुठे काही यात्रेसंबंधी सुचना लिहीलेल्या नव्हत्या. पूर्ण रांगेसाठी एकच सुरक्षा रक्षक होता. त्यामुळे लोक रांगेत घुसत होते. एकदाची पर्ची घेऊन बाहेर पडलो. थोडेसे काही खाऊन आराम केला. रात्री फ्रेश होऊन 10 वाजता मी, पत्नी वर्षा, तेजस आणि तुषार ही दोन मुले तसेच भाचा अतूल, त्याची पत्नी व मुलगा संदीप असे सर्वजण साधारण 14 किमी च्या पायी यात्रेस निघालो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर भवनकडे (वैष्णोदेवी मुख्य मंदीर) जाणारा विद्युत दिव्यांची रांग असणारा रस्ता दिसला. डोंगराला वळसा घालणारी दिव्यांची रांग खूप छान दिसत होती आणि आपल्याला एवढ्या उंच जायचे आहे हा निश्चय आम्ही मनाशी केला.



 रात्रीची वेळ असल्यामुळे मुले झोपतील की काय ही भिती होती. परंतू सर्वांचा उत्साह दांडगा होता.
वैष्णोदेवीला वर चढताना दोन-तीन पर्याय आपल्याकडे असतात. एकतर आपण पूर्णत: पायी जाऊ शकतो. पायी चालल्यामुळे शरीर व मनाला कष्ट होतात व त्यामुळे शरीर व मनातील दोष निघून जातात आणि मनामध्ये भक्तीभाव वाढतो. दुसरा पर्याय घोडे (Ponis) करून तुम्ही जाऊ शकता. वजन जास्त असलेले व्यक्ती, हृदयविकार असलेले, श्वासाचा त्रास असलेले व्यक्ती हा पर्याय निवडू शकतात. तिसरा पर्याय पालखीचा असतो. वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्तीया पालखीतून जाऊ शकतात. या पालखीला चारजण खांद्यावर उचलतात. लहान मुलांसाठी पिठ्ठू हा एक प्रकार करता येतो. हा व्यक्ती (पिठ्ठू) मुलांना खांद्यावर घेऊन वर चढतो. परंतू त्यांची गती जास्त असते त्यामुळे त्यांच्यासोबत चालणे आपल्याला अवघड जाते. तरी लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी ते खूप उपयोगी पडतात.
घोडे, पालखी आणि पिठ्ठू या तिन्ही सुविधा नोंदणीकृत आहेत त्यामुळे त्यांचे ओळखपत्र बघून व ट्रस्ट्चे दरपत्रक बघूनच यांची निवड करावी. याशिवाय हेलिकॉप्टर चा पर्यायही ट्रस्टने ठेवला आहे.     
आम्ही रात्री 10 वाजता वरती चढायला निघालो. चढ असल्यामुळे सोबत आधारासाठी काठ्या घेतल्या. सर्वजण उत्साही होते. खूप चढायचे असल्यामुळे जेवण हलकेच घेतले. गावातून जाताना बरीच दुकाने आणि वर्दळ दिसली. काही ठराविक रस्त्यापर्यंत वाहनांची, अ‍ॅटोवाल्यांची खूप गर्दी होती. पुढे संस्थानची मोठी कमान लागली. तेथे सर्व यात्रेकरूंची सुरक्षा तपासणी झाली व पुढे आम्ही पदयात्रेस निघालो. रात्र असूनही पायी चालणा-या यात्रेकरूंची संख्या खूप होती. यात्रेकरूंचा जय माता दी जोर से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी असा जयघोष चालू होता. त्यामुळे आमचा आणि मुलांचाही उत्साह वाढला. पाठीवर सॅक बॅग घेतल्यामुळे त्यात पाण्याची बाटली, स्वेटर, टोपी, नॅपकीन व इतर आवश्यक साहीत्य बसले. जाताना ठीकठीकाणी हॉटेल्स्, पाणपोई तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था असल्यामुळे हा प्रवास सुखकर होतो. जाताना बाणगंगा येथे चेक पोस्ट आहे. तेथे तुमची दर्शन पर्ची तपासली जाते. येथे स्नानासाठी घाट आहेत. येथे माता वैष्णोदेवीने बाण मारून पाणी काढले होते व तेथे स्नान केले होते म्हणून या ठिकाणाला बाणगंगा म्हणतात. तसेच येथून घोडे, पिठ्ठू इ. किरायाने मिळतात. त्यापुढे काही ठिकाणी अरूंद व वळणाचा मार्ग आहे. अशा ठिकाणी घोडेवाले, पालखीवाले आणि पायी चालणा-यांची गर्दी होते. येथेच आम्हाला थोडा त्रास झाला व चालणे अवघड झाले. वळणावर (यु टर्न) गर्दीतून वाट काढत काठीचा आधार घेऊन वर चढणे थोडे अवघड जाते. लहान मुले सोबत असल्यामुळे आम्हाला चढताना बरेचदा बसावे लागले. रात्रीचे वातावरण तसे आल्हाददायक होते. त्यामुळे दिवसापेक्षा आम्हाला खूप कमी त्रास झाला. रस्त्यात जागोजागी अंतराचे दगड होते म्हणून आम्हाला मातेच्या दर्शनाची ओढ लागली. पहाटे 4 वाजता सर्वजण चालून चालून बरेच थकले होते. त्यामुळे आम्ही 1 तास आराम केला. 5 वाजता जाग आली तर थोडेसे उजाडले होते. उष:कालात सभोवतालचा परीसर उजळून निघत होता. उंच देवदार वृक्ष, पाईन वृक्ष डोंगरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू अजून उजाडले आणि हिमालयाच्या पायथ्याच्या त्रिकूट पर्वतरांगा दिसल्या. किती मोहक दृश्य होते ते!


उजाडल्यानंतरचा 3 तासाचा वेळ कसा गेला ते कळाले नाही. परंतू आता पाय ओढत नव्हते. थोड्या वेळानंतर लगेच बसावे वाटत होते. मुलांचा उत्साह मात्र आमच्यापेक्षा चांगला वाटत होता. भवन 2 किमी असा अंतराचा दगड लागला आणि भवन मधील काही इमारती दिसायला सुरूवात झाली.




संजीछ्त या ठिकाणाहून पुढे उतार सुरू होतो. त्यामुळे चालायला सोपे जाते. या वेळी आपले उद्दीष्ट जवळ येत आहे याचा आनंद झाला. जाताना ठिकठिकाणी शेड आणि बसायची व्यवस्था होती. आजुबाजूला रमणीय वातावरण होते. असे निसर्गसौंदर्य पुन्हा पाहायला मिळेल की नाही म्हणून डोळे भरून पहावेसे वाटत होते. 8 वाजत आले होते. तरीही डोंगरांनी सुर्यप्रकाशाला अडविले होते. त्यामुळे दूर पर्वतरांगांवर फक्त सुर्यप्रकाश दिसत होता. पर्वतरांगांवर सोनेरी किरणे पडल्यामुळे ती चकाकत होती व रुबाबदार दिसत होती.    
आम्ही भवन जवळ पोहोचलो. पहातो तर मातेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी. आम्ही फ्रेश होऊन सामान क्लोक रूममध्ये ठेवायला 2 तास गेले. 10 वाजता दर्शनाच्या रांगेत लागण्यासाठी निघालो. दर्शनाची रांग जवळपास 2 किमी लांब होती. दर्शनाच्या रांगेचा शेवट शोधायला आम्हाला अर्धा तास लागला. मारुतीच्या शेपटीप्रमाणे ही रांग लांबतच होती. शेवटी कुठे उभे राहायचे याचा शोध लागला. हळूहळू रांग पुढे सरकत होती. रांगेमध्ये जय माता दी चा जयघोष चालू होता. त्यामुळे आमचा उत्साह वाढला. गर्दी खूप असल्यामुळे तेथील पूजा काऊंटर वरील साहित्यही संपले. 4 तासानंतर आम्ही प्रत्यक्ष मातेच्या गुफेपर्यंत पोहोचलो. अगदी गुफेच्या द्वारापाशी जाईपर्यंत आम्हाला येथे मंदिर असेल अशी कल्पना आली नाही. परंतू या मुख्य गुहेजवळ शिस्त चांगली होती. आमची सुरक्षा तपासणी झाली. प्रत्येक यात्रेकरूंकडील चामड्याच्या वस्तु, खाद्यपदार्थ काढून घेण्यात आले. तशा सुचना जागोजागी फलकावर लिहीलेल्या होत्याच. मुख्य गुहेसमोर पोहोचल्यावर हायसे वाटले. मुख्य गुहेत जयघोष करता येत नाही. तेथे शांततेत सर्व यात्रेकरूंचे दर्शन चालू होते. अखेर आम्ही प्रत्यक्ष गुहेत पोहोचलो. दर्शन खूप व्यवस्थित झाले. तेथे तीन पिंडींचे दर्शन घेतले.

"जय माता दी" तीन पिंडींचे दर्शन


 गुहेच्या बाहेर आल्यानंतर वैष्णोदेवी संस्थानतर्फे सर्व यात्रेकरूंना खडीसाखरेचा प्रसाद व पिंडी दर्शन असलेले एक चांदीचे नाणे दिले जाते. ते घेऊन आम्ही पुढे आलो. तेथे संस्थानच्या भोजनालयात अल्पदरात भोजन केले. थोडा वेळ आराम करून लगेच परतीच्या पदयात्रेला निघालो. येताना पूर्ण उतार असल्यामुळे लवकर चालता आले. येताना एका ठिकाणी तासभर आराम केला. त्या ठिकाणाहून भवनकडे जाणारे हेलिकॉप्टर्स् घिरट्या घालताना जवळून पाहायला मिळाले.

परत येताना महाराष्ट्रातील बरेच यात्रेकरू दिसले. परतीचा प्रवास दिवसा केल्यामुळे आजूबाजूचे पर्वत, द-या यांचे नेत्रसुख अनुभवायला मिळाले. रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत तेथे उजेड होता. जवळ आल्यावर पुन्हा अरूंद मार्ग, घोडेवाले, पालखीवाले यामुळे चालणे अवघड झाले. रात्री 9.30 वाजता आम्ही कटराला पोहोचलो. तेथे फ्रेश होऊन जेवण केले आणि आराम केला. झोप कधी लागली ते कळालेही नाही.  

Tuesday, June 5, 2012

Akshardham Delhi and Science centre Visit


दिल्ली येथील अक्षरधाम व विज्ञान केंद्राला भेट

18 मे ला परभणीहून सचखंड एक्स्प्रेसने निघालो. 19 मे ला दुपारी बरोबर 12.30 वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचलो. तेथे दादा आम्हाला घ्यायला आला होताच. त्याच्या कारने नोएडाला घरी गेलो. स्नान वगैरे आटोपून सायंकाळी अक्षरधाम मंदिरासाठी निघालो. तिथून नोएडा सिटी सेंटर या मेट्रो रेल्वे स्थानकावर गेलो. मेट्रोने अक्षरधाम स्थानकापर्यंत जायचे होते.



मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यावर असे वाटले की आपण परदेशातच आहोत. तेथे प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी यांत्रिक पाय-या (Elevator) ची सोय होती. वर गेल्यावर समजले की दर दोन मिनिटांनी एक ट्रेन येते. ट्रेन येण्यापूर्वी लोक रांगेत उभे राहतात. ट्रेन आल्यावर आपोआप तिचे दरवाजे उघडतात. आतमध्ये गेल्यावर पुन्हा थोड्या वेळाने दरवाजे आपोआप बंद होतात. आतमध्ये पूर्ण वातानुकूलित डब्बे. त्यामुळे लांब प्रवास केला तरी थकवा येत नाही. आतमध्ये मेट्रो मार्गाचा नकाशा लावलेला. तसेच स्पीकरफोनवर सतत सुचना चालू असतात.
अगला स्टेशन अक्षरधाम है। कृपया दरवाजों से हटकर खडे रहे। दरवाजें बायी तरफ खुलेंगे।“  इत्यादी. त्याचबरोबर हिंदी व इंग्रजीतून Display ही चालू असतात. प्रत्येक स्थानकावर तिकीट काढल्यावर एक टोकन मिळते. ते टोकन मशीनवर लावल्याशिवाय स्थानकात प्रवेश मिळत नाही. आणि प्रवास संपल्यावर ते टोकन मशीन मध्ये टाकल्याशिवाय स्थानकाच्या बाहेर पडता येत नाही. या सर्व अचूक नियोजनाबद्धल मेट्रो मॅन ई- श्रीधरन व त्यांच्या चमूचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असो. हे झाले मेट्रो पुराण.
आम्ही 6.20 ला अक्षरधाम स्थानकावर पोहोचलो. 6.30 वाजता अक्षरधाम मंदिराचा प्रवेश बंद होतो म्हणून धावतपळत सायकल रिक्षा करून तिथे पोहोचलो. एकदा पोहोचल्यावर मात्र रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही आत फिरू शकता. आज शनिवार- सुटीचा दिवस असल्यामुळे तिथे खूप गर्दी. मोबाईल, कॅमेरा काऊंटर वर जमा करण्यात अर्धा तास गेला व नंतर कडक सुरक्षा तपासणी होऊन आत प्रवेश मिळाला.



अहाहा! आत गेल्यावर भव्य असे अक्षरधाम मंदीर व त्याच्या आजूबाजूला अनेक सुरेख वास्तूशिल्प दिसले. प्रवेश द्वाराजवळ अक्षरधाम स्वामिनारायण मंदिराबद्दल माहीतीपर अनेक भित्तीपत्रके होती. आत गेल्यावर मंदिराचा जवळपास 25 फूट उंच गाभारा, त्यातील स्वामीनारायणाची मुर्ती दिसली. पाय-या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वारावरचे खांब सुरेख नक्षीकाम केलेले होते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उत्कृष्ट दगडी कोरीवकाम केलेला उंच घुमटाकार गाभारा दिसला. घुमटाच्या मध्यभागी छतावर स्वामिनारायणाची पद्मासनातील मुर्ती दिसली.
पुढे गेल्यावर 15 फुटी उंच स्वामिनारायणाची मुर्ती दिसली. त्या मुर्ती सभोवताली अनोख्या रंगीत कोरीवकामाचा नमुना होता. ते सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
दर्शन घेऊन खाली आलो. प्रदक्षिणा घालताना बाहेरील भिंतींवर गजराजांच्या विविध कथा कोरलेल्या होत्या. त्यात आंधळ्यांना हत्ती कसा वाटला त्याची गोष्ट, समुद्रमंथनाची गोष्ट इ. अनेक कथा शिल्परूपात सुरेख रितीने साकारलेल्या होत्या. दगडांमधील सजीवपणा येथे प्रत्ययास आला.      
रात्री 8 वाजता तेथील Musical Fountain Show बघितला. कारंजे, प्रकाश व संगीत यांचे अनोखे मिश्रण या कार्यक्रमात होते. सृष्टीचा उत्पत्तीकार ब्रह्मा, सृष्टी चालवणारा विष्णू आणि सृष्टीचा लयकर्ता महेश ही मध्यवर्ती संकल्पना घेवून आणि मानवी जीवनाच्या जन्म, बाल, तरूण, विवाह, प्रौढ व वृद्धत्व अशा विविध अवस्थांना अनुसरून सुरेख असे नाचणारे कारंजे, संगीत व विविधरंगी लाईटस् असा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.



अवघ्या 25 मिनिटांमध्ये एवढ्या रंगांचे, वाद्यसंगीतांचे आणि विविध कारंजांचे मिश्रण पाहून जीव हरखून गेला.


राजीव गांधी राष्ट्रीय विज्ञान केंद्राला भेट

दुस-या दिवशी प्रगती मैदान दिल्ली येथील राजीव गांधी राष्ट्रीय विज्ञान केंद्र बघितले. विज्ञानातील प्रयोगही कसे रंजक होऊ शकतात याचा अनुभव आला. अगदी वैदिक काळापासूनचे विज्ञान ते आजचे जनुकीय शास्त्र, रोबोटिक्स, वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, संगणक, प्राणीशास्त्र, भारतीय संगीत इ. अनेक पैलूंचा समावेश या भव्य 4 मजली विज्ञान केंद्रात केला गेला आहे. येथेच वैज्ञानिक 3D Show पाहून मग आम्ही बाहेर पडलो. येथील 4 तास कसे गेले ते कळलेही नाही.


भारतीय गणितशास्त्र
आयुर्वेद- महर्षी सुश्रूत कालीन दृश्य

भारतीय संगीत शास्त्राचा इतिहास